पुणे : ‘हरिद्वार येथील सेवा शांतिकुंज परिवाराचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन ‘गायत्री परिवार’तर्फे करण्यात आले आहे. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे,’ अशी माहिती ‘गायत्री परिवार’चे राजेश टेकरीवाल, अंकुर मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी प्रतिभा मुळे, रोहित श्रीवास्तव, हेमंत जोगळेकर, रवी गुप्ता, आशिष रहंगडाळे उपस्थित होते. युगऋषी पंडित श्रीराम शर्मा यांच्या पुस्तक प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. युगऋषी यांनी आपल्या ८० वर्षांच्या तपस्वी जीवनात तीन हजार २००पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. याबरोबरच चार वेद, १०८ उपनिषदे, श्रुती व इतर ग्रंथांवर अभ्यास करून सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपात त्याची मांडणी केली आहे.
ही पुस्तके जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारी आहेत. आत्मबल, मनोबल वाढवून तणावातून मार्ग कसा काढावा याविषयी ही पुस्तके मार्गदर्शन करतात. सामाजिक काम करणाऱ्यांसाठीही ती उपयुक्त आहेत. हा सर्व ज्ञानाचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विचारक्रांती अभियानाच्या माध्यमातून या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अतिशय सवलतीच्या दरात ही पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.
भारतीय संस्कृतीची बीजे तरुण पिढीमध्ये उतरावीत यासाठी परिवारातर्फे शाळा, महाविद्यालयांतून भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात येते. राजस्थान व छत्तीसगड या राज्यांनी तर ही परीक्षा शाळांमधून अनिवार्य केली आहे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
उद्घाटनाविषयी :दिवस : शुक्रवार, आठ सप्टेंबर २०१७
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रस्ता, पुणे.
प्रदर्शनाविषयी :कालावधी : आठ ते १७ सप्टेंबर २०१७
वेळ : सकाळी नऊ ते रात्री नऊ
स्थळ : आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रस्ता, पुणे.